शिवसृष्टी निर्मितीसाठी शासनाकडून सर्वोतोपरी साहाय्य - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा
रायगड :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार व आचार आदर्श मानून राज्य शासनाची वाटचाल सुरु आहे. पाचाड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याची माहिती देणारी भव्य दिव्य शिवसृष्टी उभारली जाणार असून, त्यासाठी राज्य शासनाकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार 352 वा राज्याभिषेक दिन सोहळा आज जेष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी दुर्गराज रायगडवर उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, रोहयो मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री योगेश कदम, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी किशन जावळे,पोलीस अधीक्षक आचल दलाल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्यासह सुरेश पवार, नितिन पावळे आदी मान्यवर आणि मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले शिवभक्त उपस्थित होते.सर्वप्रथम शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ही पवित्र भूमी शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. 352 वर्षांपूर्वी जर शिवराज्याभिषेक झाला नसता, तर आज आपण इथे नसतो. त्यांच्या दूरदृष्टी मुळे स्वराज्याचा पाया घालण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जात-पात, धर्म, वर्ण या पलीकडे जाऊन रयतेचे राज्य प्रस्थापित केले. त्यामुळे ते फक्त महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे राष्ट्रनायक आहेत. पाकिस्तान बाबत जी भूमिका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे त्यामागे देखील छत्रपती शिवाजी महाराज यांचीच प्रेरणा आहे, असेही त्यांनी सांगितले.काळ कितीही पुढे गेला आणि आपण कितीही तंत्रज्ञानाच्या गोष्टी केल्या तरी छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा आपण कुणीच विसरू शकणार नाही असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले राज्यशासनाने गडकोट किल्ले आणि मंदिरांचे जतन, संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वराज्याची ओळख नव्याने करुन देण्याची गरज आहे. हे लक्षात घेऊन आपण पर्यटनाला चालना देतो आहे. त्यासाठी भारत गौरव यात्रेच्या माध्यमातून ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन’ सुरु केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ट्रेनला आज हिरवा झेंडा दाखवला असून या विशेष रेल्वे च्या माध्यमातून नागरिकांना ऐतिहासिक किल्ले आणि गडकोट पाहता येणार आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक करताना रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी पेहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील "ऑपरेशन सिंदूर" मध्ये सहभागी वीर सैनिकांना मानवंदना दिली. त्यांनी शिवसृष्टीसाठी शासनाने मंजूर केलेल्या 50 कोटी रुपयांच्या निधीबाबत आराखडा तयार असून लवकरच काम सुरु होणार असल्याची माहिती दिली. “वारा, पाऊस, ऊन याची तमा न बाळगता स्वखर्चाने रायगडावर येऊन दोन दिवस सतत सेवा करणाऱ्या सर्व शिवभक्तांचे त्यांनी आभार मानले.शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना रायगड पोलीस दलाच्या वतीने शासकीय मानवंदना देण्यात आली. या सोहळ्याच्या निमित्ताने विविध शाहिरी कार्यक्रम, लोकनृत्ये, युद्धकलेचे सादरीकरण आणि मैदानी खेळाचे प्रात्यक्षिक यामुळे रायगडावर शिवकाल अनुभवण्याचा अद्वितीय क्षण उपस्थितांना लाभला.
------------------------------------------------------------------
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे 'स्टॉकहोम कॉन्फरन्स'मध्ये उद्या भाषण
स्वीडनमधील भारतीय समुदायासोबत संस्मरणीय संवाद
मुंबई : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार सध्या स्वीडनमध्ये इंटरनॅशनल आयडिया स्टॉकहोम निवडणूक प्रामाणिकता परिषद (International IDEA Stockholm Conference on Electoral Integrity) या आंतरराष्ट्रीय परिषदेस उपस्थित राहण्यासाठी गेले आहेत. ही परिषद 10 ते 12 जून 2025 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. तेथे ज्ञानेश कुमार यांनी स्वीडनमधील भारतीय प्रवासी समुदायासोबत मनमोकळा व संस्मरणीय संवाद साधला.
या संवादादरम्यान त्यांनी भारताच्या निवडणूक आयोगाच्या समावेशात्मक सहभाग आणि नागरिक सजगतेवरील भर दिला. विशेषत: परदेशस्थित भारतीय (NRIs) आणि प्रवासी भारतीय नागरिक (OCIs) यांच्यासाठी आयोगाने घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. यात ऑनलाइन मतदार नोंदणी प्रणाली (Online Voter Registration System) व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून टपाल मतपत्रक व्यवस्थापन प्रणाली (Electronic Transmission of Postal Ballot Management System) सारख्या उपक्रमांचा समावेश आहे, जे परदेशस्थित मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यास सुलभ करतात.भारताच्या निवडणूक व्यवस्थापनातील नेतृत्वाची दखल घेत उद्या सुरू होणाऱ्या परिषदेमध्ये ज्ञानेश कुमार यांना उद्घाटनपर कीनोट भाषण देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भारतीय निवडणुकांचा व्यापक व्याप, प्रचंड लॉजिस्टिक यंत्रणा व त्यातील व्यवस्थापन प्रणाली अनेक देशांच्या निवडणूक संस्थांना आकर्षित करत असते. सुमारे 50 देशांतील 100 हून अधिक प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होत आहेत. ही परिषद इंटरनॅशनल आयडिया (लोकशाही आणि निवडणूक सहाय्य (International Institute for Democracy and Electoral Assistance) या संस्थेद्वारे, स्वीडन परराष्ट्र मंत्रालय, स्वीडिश निवडणूक प्राधिकरण आणि ऑस्ट्रेलियन निवडणूक आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे.परिषदेच्या पूर्वसंध्येला आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे इंटरनॅशनल आयडिया (International IDEA) चे महासचिव केविन कॅसस-झमोरा यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेणार आहेत. त्यानंतर युनायटेड किंगडम, नेदरलँड्स, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, मेक्सिको, मंगोलिया, आणि स्वित्झर्लंड यांच्यासह सुमारे 20 देशांच्या निवडणूक आयुक्तांशी द्विपक्षीय चर्चा होणार आहेत. या भेटी भारताच्या जागतिक लोकशाही सहकार्य आणि उत्तम सरावांच्या देवाण-घेवाणीत योगदान करतील.या दौऱ्यात ज्ञानेश कुमार हे इंटरनॅशनल आयडियाच्या आशिया-पॅसिफिक विभागाच्या संचालिका श्रीमती लीना रिक्किला तमंग, नामिबियाच्या निवडणूक आयोगाच्या अध्यक्षा डॉ.एल्सी टी. न्गिकेंबुआ, आणि मॉरिशसचे निवडणूक आयुक्त अब्दूल रहमान मोहम्मद इर्फान यांच्यासोबतही संवाद साधणार आहेत.ही स्टॉकहोम परिषद निवडणूक प्रक्रियेच्या प्रामाणिकतेसमोरील सध्याच्या आव्हानांवर विचारमंथन करण्यासाठी जगभरातील निवडणूक संस्थांचे प्रमुख, धोरणकर्ते आणि संस्थात्मक नेते यांना एकत्र आणते. डिजिटल गोंधळ, दिशाभूल करणारी माहिती, निवडणूक सुरक्षेची चिंता, हवामानाशी संबंधित जोखमी, आणि निवडणुकांमधील कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका यांसारख्या मुद्द्यांवर चर्चेला या परिषदेत महत्त्व आहे.जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताने इंटरनॅशनल आयडिया सोबत दीर्घकाळाचे सहकार्य राखले आहे. भारताचे निवडणूक आयोग व भारत आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन संस्था (India International Institute of Democracy and Electoral Management) मार्फत जागतिक स्तरावर लोकशाही व निवडणूक व्यवस्थापनातील नवोपक्रमांचे नेतृत्व भारत करत आहे.या दौऱ्यात ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळामध्ये आयआयआयडीइएम (IIIDEM) चे महासंचालक राकेश वर्मा, कायदा विभागाचे उपमहासंचालक विजय कुमार पांडेय, आणि मुख्य सचिव राहुल शर्मा यांचा समावेश आहे.
------------------------------------------------------------------
शालेय जीवनात उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी ‘सक्षम’ कार्यक्रम ठरला प्रभावी
मुंबई : युवकांमधील उद्योजकतेला चालना देण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच अनुषंगाने शासनाच्या बरोबरीने सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून गत दोन वर्षांत नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात शासकीय व अनुदानित शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ‘उद्यम लर्निंग फाउंडेशनच्या’ माध्यमातून ‘सक्षम’ हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. यातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उद्यमशील मानसिकता विकास कार्यक्रम प्रभावी ठरल्याचे निष्पन्न झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून हा उपक्रम राबविण्यात आला होता. उद्यम लर्निंग फाउंडेशन ही मेकिन महेश्वरी यांनी ना-नफा तत्वावर स्थापन केलेली संस्था असून 14 ते 25 वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये प्रकल्पाधारित शिक्षणातून उद्यमशील मानसिकता व कौशल्ये विकसित करणे तसेच शिक्षकांना अध्यापनाच्या कौशल्यांमध्ये प्राविण्य मिळवून देणे ही या संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘सक्षम’ कार्यक्रमाची उद्दिष्टे निश्चित केली होती. विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता, आत्मविश्वास आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढवण्यास हा कार्यक्रम मदत करणार असून या माध्यमातून राज्यातील 17 हजार शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधून सुमारे 45 लाख विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. संस्थेने आतापर्यंत १२ राज्यांतील सरकारी शाळा, महाविद्यालय, आयटीआय संस्थांमध्ये २९ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना उद्योजकीय शिक्षण दिले आहे.नवोदित उद्योजकांना आपल्या व्यवसायाला आकार देऊन त्याची वाढ करण्यासाठी राज्यात योग्य वातावरण आपण उपलब्ध करून दिले आहे. महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे 14 लाख युवा मनुष्यबळ दाखल होत असल्याने त्यांच्या हातांना अधिक कौशल्यपूर्ण करण्यासाठी ‘सक्षम’ सारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिले जाणारे प्रोत्साहन अधिक उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.राज्य शासनाच्या यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये समन्वय साधून ‘सक्षम’ सारखे कार्यक्रम अधिक व्यापक पातळीवर राबविल्यास शिक्षणाच्या माध्यमातून उद्योजकतेचा पाया रुजवण्याचे हे एक प्रभावी उदाहरण ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.2023-24 मध्ये नागपूर जिल्ह्यातील निवडक शाळांमध्ये सक्षम उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाद्वारे शालेय जीवनातच विद्यार्थ्यांच्या मनावर अत्यंत प्रभावीपणे उद्यमशिलतेला चालना देणारे संस्कार घडविता आले. यातून उत्तम प्रकारे कौशल्य शिक्षणाचा एक यशस्वी प्रयत्न आम्हाला करता आला याचे समाधान आहे. यातून विद्यार्थ्यांनी नोकरी/ स्वयंरोजगार निर्मिती कशी होऊ शकते याची प्रत्यक्ष अनुभूती घेतली. विद्यार्थ्यांचा विश्वास यातून वाढला. हा उपक्रम भविष्यातही मोठे परिवर्तन साध्य करुन दाखविल, असे प्रतिपादन नागपूर जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी केले.उद्यम मार्फत राज्यात आतापर्यंत नागपूर जिल्हा परिषदेच्या ३० शाळांमध्ये पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला असून ४० प्रकल्पांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. अमरावती जिल्हा परिषदेच्या २१२ शाळांतील आठ हजार विद्यार्थ्यांसोबत कार्यक्रम राबविण्यात आला असून २०२५-२६ मध्ये ४०० शाळांमध्ये विस्तार करण्यात येणार आहे. राज्यात १५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या सक्षम कार्यक्रमामार्फत २५०० हून अधिक व्यवसाय कल्पना सादर करण्यात आल्या, १५०० प्रोटोटाइप तयार झाले, तर ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्पादनांची विक्री केली. एकूणच विद्यार्थ्यांच्या मनोवृत्तीत सकारात्मक बदल दिसून आला असून, ५०० शिक्षकांना उद्योजकतेसंबंधी प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती उद्यम लर्निंग फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली आहे.
------------------------------------------------------------------
बंदरांच्या ठिकाणी सुरू असलेली विकासकामे गती व पारदर्शकतने पूर्ण करा - मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे
मुंबई :- कारंजा, आनंदवाडी, मिरकरवाडा व ससून डॉक येथील बंदरे ही कोकणाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असून यातून तेथील लोकांच्या आर्थिक विकासास चालना मिळेल. या बंदरांच्या ठिकाणी सुरू असलेली विकासकामे गती व पारदर्शकतेने पूर्ण करा, अशा सूचना मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाची आढावा बैठक मंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला विभागाचे आयुक्त किशोर तावडे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश पाठक, उपसचिव श्री. जकाते, सह आयुक्त दिनेश देवरे, प्रादेशिक उपायुक्त प्रकाश भादुले यासह विभाग व महामंडळातील अधिकारी उपस्थित होते.
मंत्री राणे यांनी महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाच्यावतीने सुरू असलेल्या बंदरांचा विकास व आधुनिकीकरणाच्या कामांचा आढावा घेतला. यामध्ये मुंबई शहरातील ससून डॉक, रायगड जिल्ह्यातील कारंजा (उरण), सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आनंदवाडी व रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा येथील बंदरांच्या विकासकामांची माहिती घेतली.येथील बंदरांच्या ठिकाणी मासे लिलाव शेड, बर्फ कारखाना, वर्कशॉप, मासेमारीच्या जाळ्यांची दुरुस्ती व निगा राखण्यासाठी शेड, प्रसाधनगृह यांसह विविध काम केली जात आहेत. सध्या सुरू असलेल्या कामांसाठी ससून गोदी मच्छीमार बंदर येथील विकास कामांसाठी 92 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, आनंदवाडी येथील विकासकामांसाठी 88 कोटी 44 लाख रुपये, मिरकरवाडा येथील विकासकामांसाठी 26 कोटी 23 लक्ष रुपये, कारंजा येथील विकासकामांसाठी 149 कोटी 80 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कोकणातील सात ठिकाणी होत असलेल्या मासे उतरवणी केंद्रातील कामांचा देखील यावेळी आढावा घेण्यात आला.महाराष्ट्र सागरी मच्छिमार कल्याणकारी महामंडळ आणि महाराष्ट्र भूजलाशय मच्छीमार कल्याणकारी महामंडळ यांची घोषणा राज्य शासनाने ऑक्टोबर 2024 मध्ये केली आहे. यासाठी मुंबई व नागपूर येथील कार्यालयातील सध्याच्या कार्यरत यंत्रणेमार्फत काम केले जावे. या दोन्ही महामंडळाचे कामकाज तातडीने सुरू होण्यासाठी विभागाने कार्यवाही करावी, असे आदेशही मंत्री राणे यांनी यावेळी दिले.
------------------------------------------------------------------
छत्रपती शिवाजी महाराज गौरव सर्किट हा प्रेरणादायी प्रवास - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
छत्रपती शिवाजी महाराज सर्किट रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून केला शुभारंभ
मुंबई : भारतीय रेल्वेची गौरव यात्रा अंतर्गत आज पासून सुरू होणारा छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हा प्रवास सर्व प्रवाशांसाठी एक प्रेरणादायी अनुभव असेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे छत्रपती शिवाजी महाराज सर्किट अंतर्गत भारत गौरव रेल्वेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आणि स्वातंत्र्य इतिहास जिवंत ठेवण्याचे काम या रेल्वेच्या माध्यमातून होणार आहे. आज या रेल्वेतून सातशे पेक्षा जात प्रवासी प्रवास करत आहेत. यातील ८० टक्के प्रवासी हे चाळीस वर्षाच्या आतील आहेत. जे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहण्यासाठी जात आहेत. राज्यातील सर्व भागातून आलेल्या सर्व प्रवाशांना या सर्किट रेल्वेच्या माध्यमातून इतिहास अनुभवण्याची संधी मिळणार आहे. शिवराज्याभिषेकास ३५१ वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या या दिवशी ही रेल्वे सुरू होत असल्याचा आनंद आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.मोगल, परकीय आक्रमकांना पराभूत करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुढे हे स्वराज्य अटकेपर्यंत विस्तारले. ही गौरव यात्रेचा आजचा मुक्काम रायगड येथे असणार आहे. तसेच या यात्रेत शिवनेरी, लालमहाल, पुण्याची शिवसृष्टी अशा महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देणार आहे. तर कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन ही होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबतच राज्याचे संस्कृती कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार आणि त्यांचा विभाग, पर्यटन विभाग यांचे अभिनंदन करतो. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रवाशांना शुभेच्छा दिल्या. तसेच या पहिल्याच सर्किट यात्रेत प्रवास करत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले.यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, सांस्कृतिक विभागाचे सचिव विकास खारगे, पर्यटन प्रधान सचिव अतुल पाटणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी, भारतीय रेल्वेचे जनरल मॅनेजर धर्मवीर मीना, आय आर सी टी सी चे राहुल हिमालियन, महाराष्ट्र पर्यटन विभागाचे विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, वरिष्ठ व्यवस्थापक संजय ढेकणे यांच्यासह रेल्वेचे अधिकारी, प्रवासी उपस्थित होते.रेल्वे मधुन प्रवास करणाऱ्या पर्यटकांचे रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांचे कडून पारंपरिक ढोल-ताशा यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.पर्यटकांना पुष्प गुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. पर्यटकांना महाराष्ट्र राज्यातील पर्यटनाच्या दृष्टीने तयार करण्यात आलेली माहिती पत्रके वाटून माहीती देण्यात आली. एकूणच उत्साही वातावरणात पर्यटकांना या प्रवासासाठी रवाना करण्यात आले. या 5 दिवसांच्या विशेष टूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम आयोजित केले आहेत. भारतीय रेल्वे विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाशी समन्वय साधून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे या गौरवशाली ट्रेनचे हे आगमन महाराष्ट्राच्या संस्कृतीचे भव्य दर्शन घडवणारे ठरेल.भारत गौरव ट्रेन ज्या-ज्या ठिकाणी पोहोचेल, त्या ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांची सविस्तर माहीती पर्यटकांना देण्यात येणार आहे.सर्व प्रवाशांचा अनुभव सुखकर आणि संस्मरणीय व्हावा, यासाठी महामंडळाचे अधिकारी आयरसीटीसी च्या समन्वयाने प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करतील. 5 दिवसांच्या या प्रवासात रेल्वे स्थानकांपासून ते महाराजांच्या गडकिल्ल्यांपर्यंत, प्रत्येक ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणांचा वेध घेत, पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेता येईल
सहल तपशील –
पाच दिवसांची ही यात्रा पुढील ठिकाणांना भेट देणार आहे. रायगड किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक येथे झाला व ही राजधानी होती.
लाल महाल, पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण येथे गेले.
कसबा गणपती व शिवसृष्टी, पुणे – पुण्याचे ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय.
शिवनेरी किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ.
भीमाशंकर ज्योतिर्लिंग – 12 ज्योतिर्लिंग पैकी एक प्रमुख धार्मिक स्थळ.
प्रतापगड किल्ला – अफझल खानावरील ऐतिहासिक विजयाचे ठिकाण.
कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर
पन्हाळा किल्ला – बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक.
------------------------------------------------------------------
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये
मुंबई : गेल्या जवळपास दोन आठवड्यापासून राज्यातील मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे, आणि किमान 15 जूनपर्यंत तरी तो रखडलेलाच राहणार आहे. यामुळे 14 जूनपर्यंत पश्चिम किनारपट्टी वगळता राज्यातील विविध भागांमधील तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, आणि खानदेशातील कमाल तापमान अधिक राहण्याचा अंदाज आहे. या दरम्यान पूर्व विदर्भात कमाल तापमानात अजून वाढ होऊन ते 45 अंशापर्यंत जाण्याचा अंदाज आहे, तर विदर्भातील बऱ्याच भागात कमाल तापमान 40 अंशापेक्षा अधिक राहणार असल्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि खानदेशातील अनेक भागात कमाल तापमान 40 अंशाच्या आसपास राहण्याचा अंदाज देखील आहे.
14 जूनपर्यंत राज्यात सार्वत्रिक आणि मान्सूनचा पाऊस अपेक्षित नाही. पाऊस हा प्रामुख्याने दुपार नंतर आणि मेघ गर्जनेसह काही भागातच पडेल, ज्याची शक्यता या आठवड्याच्या सुरुवातीला दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य-महाराष्ट्रात अधिक राहील. तुलनेत राज्यातील इतर भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.या दरम्यान कमाल तापमान अधिक राहणार असल्यामुळे आणि सार्वत्रिक मान्सूनचा पाऊस अपेक्षित नसल्यामुळे शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.