नवी मुंबई - कर्जदार वारंवार कर्ज मागत असल्याने तणावात असलेल्या तरुणाने सीवूड दारावे गावातील तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.सदर तरुणाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असता त्यातही त्याचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असल्याची माहिती नेरुळ पोलीस ठाण्याचे एपीआय स्वप्नील इज्जेपवार यांनी दिली.सदर प्रकरणाची नोंद नेरुळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
कोरोना काळात बहुतांश जणांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेकांवर आर्थिक संकट ओढावले.त्यातच मोठ्या प्रमाणात नागरिकांवर विविध प्रकारचे कर्ज असल्याने ते फेडायचे कसे असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.यातच कर्जदार आणि बँकांनी कर्ज वसूल करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केल्याने आजमितीस जगायचे कसे असा प्रश्न कर्जदारांसमोर उभारला आहे.याचाच प्रत्यय शनिवारी दारावे गावात दिसून आला.दारावे गावात राहणाऱ्या अभिषेक यशवंत माहे (२६) या तरुणाने कर्जदार वारंवार कर्ज मागण्यासाठी तगादा लावत असल्याने मानसिक तणावात येऊन शनिवारी सकाळी ६ च्या सुमारास दारावे गावातील तलावात उडी मारून आत्महत्या केली.आत्महत्येपूर्वी त्याने एक चिट्ठी लिहून ठेवली असता त्यामधून सदर प्रकार उघडकीस आला.अभिशेष हा आपल्या परिवारासह दारावे गावात गेल्या अनेक वर्षांपासून राहत होता.त्याच्या आत्महत्येची नोंद नेरुळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून यापुढे या प्रकरणाचा तपास करण्यात येईल असे यावेळी नेरुळ पोलीस ठाण्याचे एपीआय स्वप्नील इज्जेपवार यांनी सांगितले.