एप्रिल 2020 ते जानेवारी 2021 या दहा महिन्याच्या काळात वीजबिलापोटी कोणत्याही ग्राहकांचा वीजपुरवठा थकीत बिलासाठी महावितरणने खंडित केलेला नाही. राज्यातील 41 लाख 7 हजार घरगुती ग्राहकांसह विविध वर्गवारीतील 80 लाख 32 हजार ग्राहकांनी एप्रिल 2020 ते 2021 या दहा महिन्याच्या काळात एकदाही वीजबिल भरलेले नाही. यात कल्याण परिमंडलातील 2 लाख 26 हजार 410 ग्राहकांचा समावेश असून त्यांच्याकडे 344 कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. कल्याण मंडल कार्यालय एक अंतर्गत 43 हजार 924 ग्राहक (थकबाकी 44 कोटी), कल्याण मंडल कार्यालय दोन अंतर्गत 69 हजार 303 ग्राहक (थकबाकी 165 कोटी), वसई मंडल कार्यालयांतर्गत 77 हजार 259 ग्राहक (थकबाकी 84 कोटी) तर पालघर मंडल कार्यालयांतर्गत 35 हजार 924 ग्राहकांनी (थकबाकी 51 कोटी) गेल्या दहा महिन्यात एकदाही वीजबिल भरलेले नाही.त्यामुळे वीजबिल थकबाकीत कोट्यवधी रुपयांची भर पडली असून महावितरणला प्रचंड मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. ग्राहकांना अहोरात्र 24×7 वीजपुरवठा करण्यासाठी दर महिन्याला वीज खरेदी करावी लागत असून विजेच्या पारेषणवरही मोठा खर्च करावा लागत आहे. विविध वीजनिर्मिती कंपन्यांनी त्यांच्या देणीसाठी आता महावितरणकडे तगादा लावला असून महावितरणला ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.महावितरणची आर्थिक कोंडी लक्षात घेऊन ग्राहकांनी आपल्या वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दहा महिन्यात वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांची संख्या घटली,महावितरण कठीण, आर्थिक परिस्थितीत
नवी मुंबई - कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च 2020 मध्ये देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असताना देखील महावितरणने ग्राहकांना अखंडित व नियमित वीजपुरवठा करून ग्राहकांना घरात राहणे सुसह्य केले. मात्र गेल्या दहा महिन्यात वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांची संख्या घटली असून महावितरण कठीण आर्थिक परिस्थितीत सापडले आहे. या कठीण आर्थिक परिस्थितीत वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून वीज ग्राहकांना करण्यात येत आहे.