नवी मुंबई - खासदार राजन विचारे यांनी वसई ,ठाणे ,मीरा भाईंदर, भिवंडी ,कल्याण या महानगरपालिकांना जोडणारा जलवाहतुकीचा मार्ग मोकळा झाला असून त्याच्या कामाला नुकताच केंद्र शासनाबरोबर राज्य शासनाची ही मंजुरी मिळाली आहे.ज्या जलवाहतुकीसाठी पहिल्या टप्प्यात ४ जेट्टीची कामे सुरू होणार आहे याचा पाहणी दौरा खासदार राजन विचारे यांनी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी तसेच रेल्वेचे अधिकारी पालघर जिल्हा परिषदेचे अधिकारी यांच्यासोबत आयोजित केला होता.
या पाहणी दौऱ्याला पालघर मतदार संघाचे खासदार राजेंद्र गावित ,आमदार गीता जैन, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे कॅप्टन संजय शर्मा ,अधीक्षक अभियंता सुधीर देवरे, पश्चिम रेल्वेचे सीनियर डिव्हिजनल इंजिनीयर प्रियेशअग्रवाल, तसेच पालघर जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे उपमहापौर प्रवीण पाटील, माजी नगरसेवक लक्ष्मण जंगम संदीप पाटील,बर्नाड डिमेलो, जॉर्जी व इतर नगरसेवक पदाधिकारी व पोलिस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या पाहणी दौऱ्यात भाईंदर येथील जैसल पार्क जेट्टी येथून बोटीने भाईंदर -नायगाव यांना जोडणारा पश्चिम रेल्वे रुळमार्गावरील ६० वर्षांपूर्वी बांधलेला व धोकादायक झालेला पुलाची पाहणी केली सदर पूल पाण्याच्या पातळीपासून कमी उंचीवर असल्याने जलवाहतुकीच्या मार्गासाठी अडथळा ठरत होता.या पुलावरून पालघर येथील पुंजू या गावासाठी पिणाऱ्या पाण्याची पाईपलाईन असल्याकारणाने नवीन पुलावर स्थलांतरित करण्यासाठी रेल्वेकडून बारा कोटीची डिमांड मागितल्याने सदर पुलाचे काम जिल्हा परिषदेने रोखून ठेवलेले आहे.या संदर्भात पालघर व ठाणे लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित व खासदार राजन विचारे या बारा कोटीची रेल्वेने मागितलेल्या डिमांड माफ करून देण्यासाठी रेल्वे मंत्र्यांची भेट घेणार आहेत जेणेकरून धोकादायक झालेला पूल निष्कासित करून भविष्यात मोठ्या जलवाहतुकीसाठी मार्ग मोकळा होणार आहे.खासदार राजन विचारे हे जलवाहतूक प्रकल्प सुरू करण्यासाठी आमदार असल्यापासून प्रयत्न करीत आहेत. खासदार राजन विचारे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व त्यावेळी चे तत्कालीन ठामपा आयुक्त संजीवजी जयस्वाल यांनी ठाणे जिल्ह्याला लाभलेला खाडी किनारा लक्षात घेऊन जलवाहतूक सुरू करण्यासाठी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे २८ जुलै २०१६ रोजी सादरीकरण करण्यात आले. ७ महानगरपालिकेला जोडणारा हा जलवाहतूक प्रकल्प ठाणे महानगरपालिकेने तयार केल्यामुळे ठाणे महानगरपालिकेचे नितीनजी गडकरी यांनी कौतुक केले होते. पहिल्या टप्प्यासाठी १०० टक्के व द्वितीय टप्प्यासाठी ५० टक्के अनुदान देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर ठाणे महानगरपालिकेने प्रकल्प अहवाल तयार केला आणि ऑक्टोबर २०१८ केंद्रशासनाला सादर करून मंजुरी मिळवली. परंतु हे काम सुरु करण्यासाठी प्रत्यक्ष लागणाऱ्या परवानग्या मिळविण्यासाठी विलंब लागत होता.पहिल्या टप्प्यातील जेट्टीचे काम महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डामार्फत हाती घेण्यात आले असून त्यामधील वसई -ठाणे -कल्याण या पहिल्या टप्प्यातील मार्गासाठी राष्ट्रीय जलमार्ग क्र.५३ मध्ये जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्याकरिता खालील १० ठिकाणी जेट्टी व तत्सम सुविधा निर्माण करण्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येऊन त्यामध्ये वसई, मीरा भाईंदर, घोडबंदर, नागलाबंदर, कोलशेत, काल्हेर, पारसिक, अंजुर दिवे, डोंबिवली , कल्याण हा प्रकल्प केंद्र शासनास सादर करण्यात आला.त्यापैकी सदर प्रकल्पातील काम तात्काळ सुरू करण्यासाठी पहिल्या टप्प्यात खालील ४ ठिकाणी जेट्टी
१. डोंबिवली जि.ठाणे येथे जेट्टी बांधकाम करणे.
२. कोलशेत जि. ठाणे जेट्टी बांधकाम करणे.
३. मीरा भाईंदर जि. ठाणे जेट्टी बांधकाम करणे.
४. काल्हेर जि. ठाणे जेट्टी बांधकाम करणे.
बांधण्याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल रु. १००.०० कोटी
मान्यता मिळाली असून त्यामध्ये केंद्र व राज्य शासनाचे ५०%-५०%निधी उपलब्ध होणार असून याच नुकताच राज्य शासनाकडून या आर्थिक वर्षात तरतूद करून दिल्यामुळे जलवाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.खासदार राजन विचारे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आदित्यजी ठाकरे साहेब पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच आघाडी सरकारचे सर्व मंत्र्यांचे आभार मानले आहेत.