डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋण न फिटणारे – ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ.भालचंद्र मुणगेकर , ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आधुनिक भारताची संकल्पना’ या विषयावर डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचा श्रोत्यांशी संवाद

नवी मुंबई :- स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या चार तत्वांवर आधारित आधुनिक भारत उभा करण्याची संकल्पना बाबासाहेबांच्या नजरेसमोर होती. त्यातूनच राज्यघटना आकारास आली. बाबासाहेबांचे हे ऋण आपण आजन्म मानले पाहिजेत व त्यांच्या विचारांचा आदर्श कायम नजरेसमोर ठेवून प्रवास केला पाहिजे, त्यातूनच एकात्म विचारांचा आधुनिक भारत उभा राहील असा विश्वास ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आधुनिक भारताची संकल्पना’ या विषयावर डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात मोठ्या संख्येने उपस्थित श्रोत्यांशी संवाद साधला.

                डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या देशाला पडलेले सुंदर स्वप्न असून परदेशातील कोलंबिया विद्यापीठाने त्यांच्या ४५० वर्षाच्या इतिहासातील सर्वात विद्वान विद्यार्थी असा बाबासाहेबांचा गौरव केलेला आहे. प्रचंड अभ्यासू व विचारवंत असणारा व्यक्ती प्रत्यक्ष असू शकतो यावर विश्वास बसू नये इतके बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व अलौकिक होते अशा शब्दात डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी बाबासाहेबांच्या व्यक्तित्वाचा गौरव केला.स्वातंत्र्य ही बाबासाहेबांची मुलभूत प्रेरणा होती. त्यांना जगण्याचे स्वातंत्र्य अपेक्षित होते हे स्पष्ट करताना त्यांनी विविध प्रकारच्या स्वातंत्र्याचा उल्लेख केला. स्वातंत्र्य ही चराचरातील प्रत्येक प्राण्याची गरज असून ही वैश्विक संकल्पना आहे हे स्पष्ट करीत समतेशिवाय स्वातंत्र्याला अर्थ नाही हा बाबासाहेबांचा विचार त्यांनी दैनंदिन जीवनातील अनेक साधीसोपी उदाहरणे सांगत सुस्पष्ट केला.दुस-यांच्या डोळ्यांनी पाहण्याची सवय म्हणजे बंधुता इतकी सोपी व्याख्या सांगत बंधुता हा बाबासाहेबांच्या जिव्हाळ्याचा विषय होता हे देखील त्यांनी सोपे करून सांगितले. अनेक हालअपेष्टा, अवहेलना, अपमान सहन करूनही कोणतीही कटुता न बाळगता समाजातील सर्व घटकांना न्याय देत समानता प्रस्थापित करणारी घटना आपल्याला देणा-या बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत असेही डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी सांगितले. बाबासाहेबांच्या जीवनातील काही कटु प्रसंग सांगताना ते काही काळ भावनाविवश झाले आणि त्यांचा कंठ दाटून आला.दुस-याचा हक्क नाकारणे, दुस-याचे हिरावून घेणे म्हणजे अन्याय हे सांगत न्याय हे जगण्याचे साधन आहे अशी बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली भूमिका डॉ. भालचंद्र मुणगेकऱ यांनी मांडली. घटनेतून देशाचे भविष्य घडविण्याची संधी आपल्याला लाभली आहे हा बाबासाहेबांचा विचार त्यांची थोरवी सांगणारा असून जगातील प्रत्येक देशाच्या विधिमंडळात भारताच्या राज्यघटनेची प्रत ठेवलेली आहे हा आपला अभिमान असल्याचेही डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी स्पष्ट केले.नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेले हे पुतळाविरहित स्मारक खरे तर बाबासाहेबांच्या विचारांचे स्मारक असून अभूतपूर्व असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. स्मारकातील भव्यता, स्वच्छता, ग्रंथसमृध्दी, ग्रंथ रचनेची आकर्षक पध्दती, छायाचित्र संग्रहालयाव्दारे मांडलेला बाबासाहेबांचा जीवनप्रवास सारे काही लक्षणीय असल्याचे सांगत प्रत्येक नागरिकाने आवर्जून भेट द्यावी असे हे स्मारक असल्याचे डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी सांगितले.याप्रसंगी बोलताना महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी ‘ज्ञान हीच शक्ती’ या बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारसंपदेवर आधारित उभारलेल्या या स्मारकाची ओळख ‘ज्ञानस्मारक’ व्हावी ही महानगरपालिकेची भूमिका असल्याचे स्पष्ट केले. त्यादृष्टीने येथील ग्रंथालय समृध्द करण्याकडे व तेथे ऑडिओ व्हिज्युअल साधनांव्दारे ई-लायब्ररी अधिक विकसित करून नव्या पिढीला बाबासाहेबांच्या विचारांकडे घेऊन जाण्याचे काम केले जात असल्याचे सांगितले.याच अनुषंगाने वाचनसंस्कृतीच्या वाढीसाठी, वैचारिक जागर करण्यासाठी ‘विचारवेध’ सारखी मान्यवर वक्त्यांच्या व्याख्यानांची शृंखला स्मारकाच्या सभागृहात सुरु करण्यात आली असून त्याला मिळणारा श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद बघता आता नवी मुंबई हे सांस्कृतिक शहर म्हणून नावारुपाला येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्यासारखे नामांकित व्यक्तिमत्व येथे येऊन वैचारिक जागर करते, स्मारकाचे कौतुक करते त्यावेळी केलेल्या कामाचे समाधान वाटते अशीही भावना आयुक्तांनी यावेळी व्यक्त केली.याप्रसंगी नुकताच महामहीम राष्ट्रपती महोदया यांच्या शुभहस्ते साहसी जलतरण क्षेत्रातील मानाचा ‘तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार’ प्राप्त नवी मुंबईचा साहसी जलतरणपट्टू तसेच स्वच्छ नवी मुंबई मिशनचा स्वच्छता प्रसारक युथ आयकॉन शुभम वनमाळी याचा विशेष सन्मान करण्यात आला.त्याचप्रमाणे पुस्तकविक्रीचे नवे विक्रम प्रस्थापित करणा-या ‘गोष्ट पैशापाण्याची’ या पुस्तकाचे लेखक आणि ‘लेट्स रीड इंडिया’ संस्थेच्या माध्यमातून व्यापक वाचक चळवळ राबविणारे संस्थाप्रमुख प्रफुल्ल वानखेडे याना विक्रमी ग्रंथरचनेबद्दल विशेष सन्मानित करण्यात आले.माजी नमुंमपा आयुक्त तथा विद्यमान ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर हे देखील व्याख्यान श्रवणासाठी उपस्थित होते. त्यांच्या आयुक्तपदाच्या कारकिर्दीत नाविन्यपूर्ण रितीने साकारलेल्या या स्मारकाची वर्षपूर्ती होत असताना त्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.   

Popular posts
पुण्यातून 'अपोलो' बेलापूरपर्यंत हृदय फक्त ८३ मिनिटांत, २९ वर्षांच्या तरुणावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार
Image
वनराई नष्ट करून एम.आय.डी.सी प्राधिकरणाची प्रदूषणाकडे वाटचाल, हजारो वृक्षांची कत्तल, अधिकारी गप्प ?, कायद्याचे रक्षकच बनले कायद्याचे भक्षक, एम.आय.डी.सी.कडून परवानगी नसतांनाही कंत्राटदाराकडून वृक्षतोड
Image
नवी मुंबई उद्यान घोटाळा प्रकरणी तीन अधिकारी निलंबित,कंत्राटदारावरही दंडात्मक कारवाई - राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या मागणीला यश
Image
अनधिकृत लॉजिंगमुळे शिरवणे गावाचे अस्तित्व धोक्यात, गावातील लॉजिंग अँड बोर्डिंग मध्ये वेश्याव्यवसाय, राहत्या इमारती मध्ये लॉजिंगचे अनधिकृत बांधकाम,अतिक्रमण विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष ?
Image
भारतातील सर्वात मोठा 'नमो कुस्ती महाकुंभ जामनेर मध्ये, भारतातील दिग्गज पैलवानांमध्ये एकाच मंचावर घमासान
Image