*आला उन्हाळा तब्येत सांभाळा, काय करावे, काय करू नये*

*आला उन्हाळा तब्येत सांभाळा, काय करावे,  काय करू नये*

उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्यासाठी प्रतिबंधक उपायांबरोबरच काही दक्षता आणि खाण्यापिण्यावर बंधने ठेवणेही तितकेच महत्वाचे आहे. उन्हाळ्यामध्ये उष्माघाताचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर दिसतात. यात शरीराचे तापमान उच्च पातळीवर जाते. योग्य ते उपचार वेळेवर न मिळाल्यास संबंधित व्यक्ती दगावण्याची शक्यता असते.

जागतिक तापमानवाढीमुळे वातावरणात सतत बदल होत आहेत.  पूर्वी उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या ऋतूंचा वेळ-काळ, ठरलेला असायचा.  परंतू आता मात्र तसे नाही. जागतिक तापमानवाढीमुळे उन्हाळ्यात पाऊस, हिवाळ्यात वादळीवारे आणि पाऊस,  पावसाळयात कडाक्याचे ऊन अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.जागतिक तापमनावाढीमुळे  नियमित व वेळेवर पाऊस न पडल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ऊन्हाळयाची दहाकता जास्त जाणवत आहे. सध्या विविध ठिकाणी उन्हाचे तापमान 43 ते 44 अंश सेल्सीएस पर्यंत  पोहचले आहे.  यामुळे त्वचाविकार, काविळ, टायफाईड, घशाचे आजार, गोवर  तसेच उष्माघात असे आजार उद्भवू लागले आहेत.   वर्तमानपत्र व तसेच वृत्तवाहिन्यांवर उष्माघातच्या बातम्या मोठया प्रमाणात पहावयास मिळत आहेत.

शरीराने मर्यादेपेक्षा जास्त उष्णता निर्माण केली किंवा उष्णता शोषून घेतली तर हायपरथर्मिया म्हणजेच अतिउच्च तापमानाचा आजार होतो. “उष्माघात” हा त्याचाच एक प्रकार आहे. बाहेरचे तापमान प्रमाणाबाहेर वाढले की शरीरातील तापमान नियंत्रित करण्याची यंत्रणा कोलमडते. उष्माघात झाल्यावर चक्कर येणे, मळमळ, उलट्या होणे, डोकेदुखी, दरदरून घाम फुटणे, थकवा येणे  स्नायूंना आकडी येणे अशी लक्षणे दिसू लागतात. म्हणजे प्रमाणाबाहेर वाढलेले शारीरिक तापमान (104 डिग्री पेक्षा जास्त). घाम बाहेर पडत नाही त्यामुळे त्वचा गरम आणि कोरडी होते. घाम येण्याचे थांबते, नाडीची आणि श्वासाची गती वाढलेली असते, रक्तदाब सुरुवातीला वाढतो आणि नंतर कमी होतो, शरीरात ताठरता येते, हात आणि पायात आकडी (क्रांप्स) येतात, मानसिक बदल होतो, चिडचिड होते, भ्रम होतो आणि कोमा म्हणजेच बेशुद्धवस्था येते आणि मृत्यू सुद्धा ओढवू शकतो. हे असे क्रमाक्रमाने होते, बेशुद्धवस्था हा वयस्कांमध्ये उष्माघातचा पहिला संकेत असू शकतो.

नागरिकांनी उन्हाळ्यात स्वत:ची व कुटुंबाची काळजी कशी घ्यावी यासाठी शासकीय यंत्रणांमार्फत मार्गदर्शक सुचना प्रसिध्द केल्या जात आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्वातंत्र कक्ष निर्माण करण्यात आले आहेत.   उन्हाळ्यातील उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी पुढील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.


काय करावे                                           


• तहान लागलेली नसली तरी सुध्दा जास्तीत जास्त पाणी पिण्यात प्यावे. • हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. • बाहेर जातांना गॉगल्स, छत्री/ टोपी, बूट व चपलाचा वापर करण्यात यावा. •  प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी. • उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा.  तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावे. • शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस (ORS), घरी बनविण्यात आलेली लस्सी,  तोरणी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करण्यात यावा. •अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उष्माघात होण्याची  चिन्हे ओळखावित व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.


            नागरिकांनी स्वत: बरोबर पशू प्राण्यांची काळजी घेणे आवश्यक आहे त्यासाठी  गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे. • घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा.  तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे. • कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. • सूर्य प्रकाशाच्या थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करण्यात यावे. • पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. • बाहेर कामकाज करीत असताना अधूनमधून विश्रांती घेऊन नियमित आराम करावा. • गरोदर, कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी. • रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत. • जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी.


 काय करू नये :-


• लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये. • दुपारी १२.०० ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. • गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. • बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. दुपारी १२.०० ते ०३.३० या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे. • उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी  ठेवण्यात यावी.


उन्हाळ्यात त्रास होऊ लागल्यास जवळच्या शासकीय जिल्हा रुग्णालय अथवा तालुका किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करावा. अनेक आरोग्य केंद्रात उष्णतेचा त्रास होणाऱ्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्षाची सोय करण्यात आली आहे.