नवी मुंबई - रिलायन्स जिओ इन्फोकॉम लि. कंपनीच्या ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी नवी मुंबईच्या विविध भागात नवी मुंबई महानगरपालिकेकडून अटी व शर्तीच्या आधीन राहून खोदकाम करण्यास परवानगी देण्यात आली असता कंपनीकडून त्याचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले आहे.केबल टाकण्यासाठी खोदलेले रस्ते गेल्या अनेक दिवसांपासून उघड्यावरच ठेवण्यात आल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे या खड्यात पाणी साचले असून जर एखादा मोठा अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे.तर मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी नुकत्याच खोदकामासंदर्भात केलेल्या सूचनांनाही कंपनीने धाब्यावर बसवले असल्याचे दिसून आले आहे.
शहराच्या विविध भागात रिलायन्स जिओ इन्फोकॉम लि.कंपनीचे ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम सुरु असून त्या साठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करून फायबर केबल टाकण्यात येत आहेत.खोदकाम केलेल्या भागात मनपाकडून दोनच विद्युत केबलच्या वाहिन्यांसाठी परवानगी देण्यात आली असता कंपनीकडून तीन तीन वाहिन्या टाकण्यात आले असल्याचे दिसून येत आहे.ज्या ठिकाणी खोदकाम केले आहे त्या संरक्षण कठडा बसवणे गरजेचेच असतांना कंपनीकडून त्या बाबतीत कोणतीही खबरदारी घेण्यात आलेली दिसून येत नाही.त्यामुळे चालणाऱ्या आणि वाहनचालकांना या ठिकाणावरून चालणे धोकादायक ठरू लागले आहे.याचाच फटका एका वाहन चालकाला बसला असून त्याच्या वाहनाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.खोदकाम करण्यात आलेल्या खड्यातच वाहनाचे एक चाक अडकल्यामुळे वाहन बाहेर काढणे काही वेळ जिकरीचे झाले होते.जर वेळीच यावर मनपा कडून पावले उचलली न गेल्यास याचे गंभीर पडसाद उमटू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोट - रिलायन्स जिओ इन्फोकॉम लि.च्या कामाबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यांना उपअभियंता सुधाकर मोरे यांच्या माध्यमातून काम बंद करण्यास सांगण्यात आले आहेत.तर लवकरच त्यांच्याकडून खोदण्यात आलेले खड्डे ही भरून घेण्यात येतील.
सचिन नामवाड - कनिष्ठ अभियंता ,नवी मुंबई महानगरपालिका